देशभरात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडायला लागला आहे. आरोप प्रत्यारोप, दावे प्रति दावे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे जनतेचे मनोरंजन होत असून मूळ प्रश्नांना मात्र बगल देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना तिसऱ्या टप्प्याची अनेक राजकीय पक्षांना प्रतीक्षा आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार हे भाजप बरोबर यायला तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अशाच प्रकारचं एक सूचक वक्तव्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘भाजपा आणि महायुतीवर लोकांचं प्रचंड प्रेम आहे. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक बदल झाले आहेत’. भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत उपकार देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं होतं, अजित पवार आले तर त्यांचे स्वागत केले जाईल का? बाकी कुणीही चालतील पण भाजप नको, असं उत्तर दिले होतं.
मात्र यावेळी पत्रकाराने फडणवीस यांना विचारले शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपमध्ये आले तर त्याचे स्वागत होईल का? या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले की ‘राजकारणात ‘जर तर’ला काहीही अर्थ नसतो. त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. मात्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपमध्ये जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर राज्यात काय काय गडबडी होतात, याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.