नगर आरटीओचा बेजबाबदार कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. शहर आणि परिसरात विनानंबरचे अनेक डंपर्स भरधाव वेगानं धावत आहेत. शहरातल्या वसंत टेकडी भागात काल (दि. २७) यापैकीच एका डंपरने दोघांचा बळी घेतला. नगर आरटीओच्या भरारी पथकाला असे डंपर्स का दिसत नाहीत? या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांचे डोळे फुटले आहेत का, असा सवाल उपस्थित करत या अपघातप्रकरणी नगर ‘आरटीओ’ला सहआरोपी करा आणि भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संतप्त नगरकरांमधून केली जात आहे.
नगर शहर आणि परिसरात असे अनेक डंपर्स अवैध वाळू वाहतुकीचा व्यवसाय करत आहेत. हे डंपर्स भरधाव वेगाने पळवले जाताहेत. यापूर्वी अनेकांचा या डंपर्समुळे जीव गेलेला आहे. कालचा अपघातसुद्धा अशातलाच प्रकार आहे.
नगर आरटीओच्या भरारी पथकासह या विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक लागेबांधे आहेत की काय, अशी शंका या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.
प्रशासन आणखी किती लोकांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे, असा देखील प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. नगर शहरातून अनेक महामार्ग जात आहेत. यापैकी नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या वसंत टेकडी चौकात भीषण अपघात झाला आणि दोघांचा जीव गेला. अशा अपघातांचं गांभीर्य प्रशासनाला कधी कळणार, हादेखील मोठा प्रश्नच आहे.