Union Budget 2023: बजेट तयार करणारे अधिकारी असतात नजरकैदेत, हे तुम्हाला माहीत आहे का?
Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी देशातच बजेट संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्प हा एक अत्यंत गोपनीय दस्तऐवज आहे आणि त्याच्या तयारी दरम्यान, त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची टीम बजेटच्या दिवसाच्या १० दिवसांपासून नजरकैदेत जाते. यादरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम मंत्रालयातच हजर राहते.
- हायलाइट्स:
१ फेब्रुवारी रोजी देशाचं अर्थसंकल्प संसदेत मांडलं जाणार आहे
हलवा समारंभाने अर्थसंकल्प छपाईची सुरुवात होते
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी २.० सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.
नवी दिल्ली: आर्थिक २०२३-२३ साठी देशाचं सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थमंत्री म्हणून सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. तर पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोदी २.० सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात मंदीचा सामना करत असताना अर्थमंत्र्यांचे बजेट महत्त्वपूर्ण असेल. तज्ज्ञांनुसार यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, अर्थसंकल्पापूर्वी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवले जाते, हे तुम्हाला माहित आहे का? असं का होतं जाणून घेऊया…
देशाचा लेखाजोखा तयार करताना या कामात सहभागी असलेले अधिकारी सुमारे १० दिवस कैदेत राहतात. त्यांना बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी बोलण्याची मुभा नसते.
अर्थसंकल्प कोण तयार करते?
एका आर्थिक वर्षासाठी देशाचं अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयाचा सल्ला घेतला जातो. तर अखेरचा अर्थसंकल्प तयार करताना वित्त सचिव, महसूल सचिव आणि खर्च सचिव यांची भूमिका विशेष महत्त्वाची असते. हे सर्व अर्थमंत्र्यांना खर्च आणि कमाईचे अंदाजे तपशील सादर करतात. आणि जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही तोपर्यंत बैठका सुरूच असतात. इतकंच नाही तर विविध क्षेत्रातील तज्ञ देखील बजेट टीममध्ये काम करतात. तसेच अर्थमंत्र्यांच्या बजेट टीमला मुख्य आर्थिक सल्लागाराचीही गरज असते. तसेच पंतप्रधानही या टीमला वेळोवेळी मार्गदर्शन देत राहतात. त्याचबरोबर अनेकवेळा विविध संघटनांच्या मागण्या व सूचनांवरही बदल केले जातात.
बजेटच्या पूर्वी नजरकैदेत का?
अर्थसंकल्प एक अत्यंत गोपनीय दस्तावेज असून याबाबत सर्व बाजूंनी खबरदारी घेतली जाते. अर्थसंकल्पाच्या दिवसापूर्वी बजेटशी संबंधित एकही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून ते तयार करणारे सर्व अधिकारी १० दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात राहतात आणि बाह्य जगाशी त्यांचा कोणताही संपर्क राहत नाही. संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आणि अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांना तळघरात राहावे लागते. यादरम्यान, जर कोणतीही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील मंत्रालयात उपस्थितीत असते. देशाच्या अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती पूर्णपणे गोपनीय राहावी याची खात्री करण्यासाठी प्रत्येक तपशीलाचे अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते.
इतकेच नाही तर अर्थ मंत्रालयात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेशही दिला जात नाही. केवळ बजेट दस्तऐवज तयार करणाऱ्या टीमलाच नाही तर त्याच्या छपाईशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बाहेर जाण्यास किंवा सहकाऱ्यांना भेटण्याची मनाई असते.
अर्थसंकल्प तयार होत असताना शेवटच्या १० दिवसांत इंटरनेट वापरावर बंदी घातली जाते. इंटरनेट आणि NIC सर्व्हर ज्या संगणकांवर बजेट दस्तऐवज आहेत त्या संगणकांवरून वेगळे केले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हॅकिंग होत नाही. हे संगणक फक्त प्रिंटर आणि प्रिंटिंग मशीनशी जोडले जातात. अर्थ मंत्रालयाच्या ज्या भागात प्रिंटिंग प्रेस आहे, तिथे निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच जाण्याची परवानगी आहे.