लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा उद्यापासून (दि. २०) सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची वक्तव्यं जनतेचं ‘एंटरटेनमेंट’ करत आहेत. मात्र या अनेक नेत्यांपेक्षा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे वेगळ्या विचारांचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याविषयी प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच काही तासांपूर्वी केलेलं एक खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, ‘शरद पवारांना मी धर्मनिरपेक्ष मानत नाही. धर्मनिरपेक्ष असल्याचे खोटं सांगत आहेत. ते धर्मनिरपेक्ष नाहीत. तर ते संधी साधू आहेत’, असा दावा करत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे धर्मवादी असल्याचं उघड आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपकडे जातील, असा दावा करत असताना आंबेडकर यांनी म्हटलंय, ‘ठाकरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. याशिवाय ठाकरे यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही. ठाकरे यांच्याप्रमाणेच शरद पवार हेदेखील भाजपमध्ये जातील, असंही वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील, या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर म्हणताहेत, की 2014 आणि 2019 मध्ये भाजप 70 ते 72 टक्क्यांवर निवडणूक घेऊन गेले होते. ते आता 50 ते 60 टक्क्यांवर आले आहेत. कमी मतदानाचा फटका भाजपला बसणार आहे. त्यामुळे भाजप यावेळी ‘अब की बार 404 पार’ नाही तर अवघ्या 250 जागा भाजपला मिळतील’.