रेव्हेन्यू अर्थात मालमत्ता कर जास्तीत जास्त कसा मिळेल, यासाठी नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा जो काही आटापिटा सुरु आहे, तो अतिशय संतापजनक आहे. सर्वसामान्य माणसाचा जीव धोक्यात घालून नगर कॅन्टोन्मेंट बोर्डानं फ्लेक्स लावण्याची परवानगी दिली आहे.
नगर शहरातल्या सतत वर्दळ असलेल्या स्टेट बँक चौकात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीचं छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलावर भला मोठा फ्लेक्स लावण्यासाठी लोखंडी अँगल बसविण्यात आले आहेत. हे सारं धोकादायक असल्याचं माहित असूनही यासाठी संबंधित व्यक्तीला कशी परवानगी दिली, यासाठी कुठले नियम आणि निकष लावण्यात आले, याचा जाब खरं तर स्थानिक नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला विचारण्याची गरज आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीचे हे व्यापारी संकुल आहे. या इमारतीवर जाहिरातीचा फ्लेक्स लावण्यासाठी संभाव्य दुर्घटनेचा कुठलाही विचार न करता नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला एकप्रकारे पायघड्याच टाकल्या आहेत. परंतु भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? या परिसरातली माणसे मेल्यानंतरच नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाला जाग येणार आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
मालमत्ता कर वाढवणं किंवा उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणं, हा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा अधिकार आहे. मात्र हे करत असताना निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालून कोणाच्या तरी हितासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नियम डावलून हा असा आततायीपणा नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाला भविष्यात कधी तरी महागात पडणार आहे.
ज्या कोणाला या ठिकाणी फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी देण्यात आली, त्या व्यक्तीनं भाड्यापोटी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात किती रुपयांचा भरणा केला, कॅन्टोन्मेंट बोर्डाने संबंधित व्यक्तीबरोबर यासाठीचा काही करारनामा केला आहे का, अशी विचारणा स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अजब कारभार…! – सरकारी कार्यालयाचे नियम सर्वांना सारखेच आहेत. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो. मात्र एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, अशी कार्यपद्धती नगर कॅन्टोन्मेट बोर्डाच्या कार्यालयात दिसून येत आहे. घराचे बांधकाम करताना एखाद्याकडून नजरचुकीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नियमांचा भंग झाला तर संबंधित अधिकारी त्या नागरिकाला लगेचच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात आणि त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र रेव्हेन्यू मिळतोय म्हणून लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कोणालाच नाही. वास्तविक पाहता नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अजब कारभाराला सारेच वैतागले आहेत.