जुनी जाणती माणसं असं सांगतात, की मुंबईत असा एक डॉन होऊन गेला, की त्यानं एकसुद्धा गोळी झाडली नाही. मात्र मुंबईवर त्यांनं बिनदिक्कतपणे राज्य केलं. असा प्रचंड दबदबा आणि दहशत असलेल्या या डॉनचं नाव होतं हाजी मस्तान. त्याच कालखंडामध्ये मराठी चित्रपटाला आगळावेगळा दर्जा प्राप्त करून देणारे, डबल अर्थी डायलॉग देऊन प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या स्व. दादा कोंडके आणि हाजी मस्तान यांची मैत्री आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहित आहे.
एकदा दादा कोंडके हे त्यांच्या कार्यालयात काम करत बसले होते. एक मुलगा तिथं आला आणि दादांना भेटायचं म्हणून तो दादांच्या समोर जाऊन उभा राहिला. काही वेळाने त्या मुलानं दादांच्या समोर असलेल्या टेबलवर सोन्याची बिस्किट ठेवली. एवढी सोन्याची बिस्किटे पाहून दादा कोंडके यांना आश्चर्य वाटलं.
त्या मुलांनं दादांकडे आग्रह धरला, की 15 लाख रुपयांची ही सोन्याची बिस्किटं दादांनी आठ लाखांमध्ये खरेदी करावी. मात्र दादा कोंडके यांनी त्याला स्पष्ट सांगितलं, मी हा व्यवहार करत नाही. परंतु त्यानं खूप आग्रह धरला. शेवटी तो पंधरा लाख रुपयांची सोन्याची बिस्किटं दादा कोंडके यांना अवघ्या एक लाख रुपयांत द्यायला तयार झाला. मात्र दादा कोंडके ‘नंतर पाहू, माझ्याकडे पैसे नाहीत’, असं म्हणाले. बराच वेळ थांबून तो मुलगा शेवटी निघून गेला.
दादा कोंडके यांच्या कार्यालयाच्या खाली हाजी मस्तानचं कार्यालय होतं. हाजी मस्तान दादा कोंडके यांना भेटायला नेहमी येत होता. हाजी मस्तान आणि दादा कोंडके यांची मैत्री चांगलीच घट्ट झाली होती. दादा कोंडके यांना काही लोकांनी हाजी मस्तानपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र माझी केवळ त्याच्याशी मैत्री आहे. कुठला आर्थिक व्यवहार नाही. त्यामुळे मला घाबरण्याचं कारण नाही, असं उत्तर दादा कोंडके यांनी दिलं होतं.
अशाच एके दिवशी नेहमीप्रमाणे हाजी मस्तान दादा कोंडके यांना भेटायला आला. दादांना त्यांनं विचारलं, एक मुलगा सोन्याची बिस्किटं घेऊन तुमच्याकडे आला होता का? दादा कोंडके यांनी ‘हो’ असं उत्तर दिलं. नंतर काही दिवसांनी बातमी आली, की हाजी मस्ताननं त्या मुलाचा खून केला. ही बातमी समजल्यानंतर दादा कोंडके ‘सुटलो बाबा एकदाचं’ असं स्वतःशीच पुटपुटले.