पुण्यातल्या कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री अग्रवाल आडनावाच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या नुकताच बारावी परीक्षा पास झालेल्या अल्पवयीन मुलानं मित्रांसमवेत पहाटे तीनच्या सुमारास वडिलांच्या दोन कोटी रुपयांची इम्पोर्टेड कार भरगाव वेगानं तेही मद्यप्राशन करुन दोन कोटींच्या कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन 25 वर्षांच्या युवक युवतीला चिरडलं. या दोघांनाही फुटबॉलसारखं उडवलं. फरपटत नेलं.
लोकांनी ॲक्सिडेंटनंतर त्या मोठ्या बापाच्या अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना पकडून चोपही दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. या बाल युवकाला बाल न्याय मंडळानं रविवारी जामीनही मंजूर केला. या बाल युवकानं येरवडा वाहतूक पोलिसांबरोबर पंधरा दिवस वाहतूक नियमनाचं काम करावं, बाल युवकानं अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहावा. त्या बाल युवकानं वाहतूक जागृती फलक रंगवावेत आणि मानसोपचार तज्ञांचे समुपदेशन घ्यावं.
अशा अटी आणि शर्ती न्यायालयानं जामीन देताना सांगितल्या.
जय हो …! आरोपीला दोन युवकांना चिरडताना दारु पिलेला असताना सर्वांनी पाहिलंय. न्यायालयाने ते मान्य ही केलंय.
पोलिसांनी ही पाहिलंय.
पण आपला कायदा बघा कसा आहे.
अख्खा पेपर (वर्तमानपत्र) या बातमीच्या फुल पेजनं, हाफ पेजनं भरलेलं आहे. पण त्या युवकाच्या वडिलांचं म्हणजे बांधकाम व्यावसायिकाचं किंवा त्याच्या बारावी पास झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव पेपरमध्ये कुठंही नाही.
हे नाव पोलिसांना, मिडियाला आणि तिथं अपघात पाहिलेल्या लोकांनाही माहिती आहे. पण नाव पेपरमध्ये नाव नाही.
असं का? हा प्रश्न विचारावासा वाटतो. जे 25 वर्षे वयाचे उच्च विद्याभूषित युवक – युवती चिरडले गेलेत. त्यांचं काय? त्यांच्यावर कोण कोण अवलंबून आहेत? त्यांना काय भरपाई मिळेल का नाही?
या अपघातात चिरडलेल्या आणि मरण पावलेल्या युवकांचं आणि घरच्यांचं काय? या सर्व व्यवस्थेमध्ये चूक कोणाची? यात नियम कोणते? कोणी पाळायचे?
पोलिसांचा रोल काय? पालकांचा रोल काय?
इथंही फक्त वर्षानुवर्षे आर्थिक गणितंच सांभाळली जाणार आहेत का? यामुळे आपला देश मागे आहे का? यातून काय निष्पन्न होणार? माझ्या मते लोक आठ दिवसांत सर्व विसरुन जातील. ‘जैसे थे’ परिस्थिती असेल. त्या अल्पवयीन मुलाच्या वयाची, शासनाची व्याख्या काय असावी?
आत्ताच असं कळालं, की मुलाच्या वडिलांवर व त्या बार चालकांवर गुन्हा दाखल झालाय.
पण बार चालक एवढ्या रात्रीपर्यंत कसे जागे असतात?
एवढ्या रात्री दारू का विकतात?
या अल्पवयीन श्रीमंत मुलं गाडी का चालवतात?
पोलिसांचा रोल काय असतो?
गुन्ह्याची सुरुवात कुठून होते?
माझ्या माहितीप्रमाणं मद्य खरेदी करणं, मद्य बाळगणं, मद्याची वाहतूक करणं, मद्य प्राशन करणं,
याला लायसन्स लागतं म्हणे? यावर काही सोल्युशन आहे का हो? हे सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत. आपली संस्कृती बदलत चाललेली आहे. यातून आर्थिक गणितंही वाढत चाललेली आहेत. ही शंका मात्र माझ्यासारख्याच सामान्य माणसाच्या मनात येते.