ब्रेकिंग – काम पूर्ण न करताच बील काढले.. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा …!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी…!
महासत्ता भारत / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्हा परिषदेतल्या सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागात स्वच्छतागृहांची काम अपूर्ण असतानाच बिलं काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना सेवेतून निलंबित करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने (आठवले गट) करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाप्रमुख रोहित आव्हाड यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे. त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतल्या स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम बी – १ पद्धतीने मौजे दशमीगव्हाण ग्रामपंचायतवर टाकण्यात आले आहे.
मात्र शासन निर्णयानुसार जर बी – १ ची निविदा (टेंडर) काढायची असेल तर १० किलोमीटर अंतराच्या आतल्या ग्रामपंचायतीवर सदरची काम टाकण्यात यावे, असा नियम आहे.
असे असताना देखील सदर कामाची वर्क ऑर्डर आणि देयक ४/५ दिवसांच्या फरकाने २४ मार्च २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत सदरचे काम पूर्ण केल्यास भासवून जिल्हा परिषदेची दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आली आहे. सदरच्या स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी सदर पत्राद्वारे करण्यात आली आहे.