काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि थेट राज्यसभेत गेलेले माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला थकहमीपोटी 147. 79 कोटी रुपयांची राज्य सहकारी बँकेनं आर्थिक मदत केली.
काँग्रेसमध्ये असलेले आणि भाजपला सतत मदत करणारे धनाजीराव साठे यांच्या कुर्मदास सहकारी साखर कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. बीडचे अमरसिंह पंडित यांच्या जय भवानी साखर कारखान्याला 150 कोटी रुपयांची मदत करण्यात आली.
हर्षवर्धन पाटील, अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे, धनंजय महाडिक या सर्वांच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या अतिरिक असलेल्या राज्य सहकारी बँकेनं भरभरून आर्थिक मदत केली. मात्र माजी मंत्री पंकजा मुंडे यांना सरकारकडून पुन्हा एकदा बेदखल करण्यात आलं आहे.
भाजप नेत्यांची पंकजा मुंडे यांच्यावरची नाराजी नक्की का आणि कशामुळे आहे, हे मात्र कळायला सध्या काहीही मार्ग नाही. ज्या स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप हा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांचा पक्ष असताना ‘संघर्ष यात्रे’च्या माध्यमातून त्या पक्षाला स्व. मुंडे यांनी तळागाळापर्यंत नेलं. मात्र त्याच मुंडे यांच्या लेकीबद्दल सरकार अशा पद्धतीने का वागत आहे? माजी मंत्री पंकजा मुंडे यांना सापत्नभावाची वागणूक का दिली जात आहे? यामुळे पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या वंजारी समाज बांधवांचा भाजपवर असलेला रोष वाढणार की कमी होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं भाजपचे श्रेष्ठी शोधणार आहेत का, हाच खरा प्रश्न आहे.