लोकसभेची निवडणूक होऊन निकालही जाहीर झाला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवडदेखील झाली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचीही निवड करण्यात आली. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. एवढं सारं होऊनदेखील बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसकडून अत्याचार सुरुच आहेत.
तृणमूल काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांची घरे, दुकान आणि शाळा जाळून टाकत आहेत. या सर्व अत्याचाराला कंटाळून स्वसंरक्षणार्थ भाजपच्या या कार्यकर्त्यांनी कुटुंबासह कोलकाता शहरातल्या मुरलीधर रोड परिसरात असलेल्या भाजप कार्यालयात आश्रय घेतला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या अत्याचारापासून आम्हाला वाचवावं, असं साकडं 170 भाजप कार्यकर्त्यांनी घातलं आहे.
भारत देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणूक होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राग अजूनही गेलेला आहे. या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर अमानुष असे अत्याचार सुरु आहेत. या अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी 10 जूनपासून भाजपच्या कार्यालयात आश्रय घेतला आहे.
तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात हल्ले करत आहेत. भाजपचे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये अनेक जिल्ह्यात हिंसाचार होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांनी म्हटलंय, की ‘भाजप स्वतःच्या लोकांना कार्यकर्त्यांवर हल्ले करायला लावत आहे. लोकसभा निवडणूक जनतेनं भाजपच्या विरोधात निकाल दिला आहे. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपकडून हिंसाचाराचा अवलंब होत आहे’.