मागील ४५ दिवसांत खासदार डॉ. सुजय विखे यांनी कुणावरही टिका टिप्पणी न करता पंतप्रधान मोदी आणि आपल्यामार्फत केलेल्या कामांच्या जोरावर मतं मागीतली. पण सांगता सभेत त्यांनी घेतलेली आक्रमता ही कार्यकर्त्यांना नवी उर्जा देणारी ठरली.
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खा. डॉ. सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. ‘जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही’, असा स्पष्ट इशाराही खासदार डॉ. विखे यांनी दिला.
शनिवारी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंद्यातील शनी चौकात सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संबोधित करणार होते. सभेला हजारो लोकांची गर्दी जमली असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने ही सभा आटोपती घ्यावी लागली.
असं असतानाही डॉ. सुजय विखे यांनी भर पावसात लोकांशी संवाद साधला.
डॉ. विखे यांनी मागील ४५ दिवस भर उन्हात निष्ठेने प्रचार केला म्हणून सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी विरोधी उमेदवारांनी मागील ४५ दिवसांत केलेल्या खोटारड्या प्रचाराचा समाचार घेतला. लोकांना शिव्या देणं, अधिकाऱ्यांना धमकावणं, पोलिसांचा बाप काढणं, कार्यकर्त्यांना मारहाण करणं, समाज माध्यमांवरून खोटेनाटे व्हिडीओ टाकून अफवा पसरविणं अशा सगळ्याच गोष्टींवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.
खासदार डॉ विखेंनी लोकांना आश्वस्त केलं की, येणाऱ्या काळात अशा सर्व समाज विघातक प्रवृत्तींना चांगला धडा शिकवला जाईल.
ते म्हणाले की, ०४ जूनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास हेच आपले एकमेव ध्येय राहणार आहे.
नगरमधील विविध प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करायची आहे. माझ्याकडे अद्वितीय अहिल्यानगरचे व्हिजन असून तुम्हाला गर्व वाटेल, असा विकास मी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यामुळे मतदान करताना देशाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पाहून मतदान करा, असा संदेश त्यांनी दिला.
कुणीही घाबरायचं कारण नाही. कारण महायुती सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जर कुणी दमदाटी, गुंडशाही, दडपशाही करत असेल तर त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाणार असल्याचे ते शेवटी म्हणाले. डॉ. सुजय विखेंच्या जोरदार भाषणाने भर पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. अवघे मैदान जय श्रीराम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुजय विखे यांच्या घोषणेनं दुमदुमून गेलं.