आयुष्यात एक क्षण असा येतो, की त्या क्षणाला आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. ‘दोनाचे चार हात होणे’ अर्थात लग्न समारंभ. मात्र या लग्न समारंभात काही क्षणानंतर मंगलाष्टका सुरू होणार होत्या. त्याचवेळी नवरीच्या हे लक्षात आलं, की नवरदेव दारू पिऊन येत आहे. संतप्त झालेल्या नवरीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि वऱ्हाडी मंडळीला नवरीशिवाय हात हलवत माघारी जावं लागलं.
उत्तरप्रदेशच्या संत कबीरनगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. नवरदेवाने लग्नाच्या आधी मित्रासोबत दारू ढोसली. जेव्हा नवरीला ही गोष्ट कळली, तेव्हा तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. एवढंच करून ती थांबली नाही तर तिने पोलिसांनादेखील बोलावलं. पोलिसांनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरी तिच्या निर्णयावर ठाम राहिली.
उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये असलेल्या घनकटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोतहा या गावात शुक्रवारी (दि. २६) ही घटना घडली. भोतहा गावातल्या एका मुलीचं आजमगड जिल्ह्यातल्या एका गावातल्या मोहित नावाच्या मुलाशी लग्न ठरलं. आजमगडवरून लग्नाचे वऱ्हाड आलं. पण नवरदेव दारूच्या नशेत होता. त्यामुळे नवरीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि मुलीकडच्या मंडळींनी केलेला खर्च मुलाकडच्या मंडळीकडून वसूल करण्यात आला.