३८ बळी गेले तरी मालेगाव बाँबस्फोटाचा तपास संथ गतीनं का? संवेदनशील मालेगावात एकदा नव्हे दोनदा झाला बाँबस्फोट!

spot_img

३८ बळी गेले तरी मालेगाव बाँबस्फोटाचा तपास संथ गतीनं का ?संवेदनशील मालेगावात एकदा नव्हे दोनदा झाला बाँबस्फोट!

सन २००८ मध्ये रमजान सण काही तासांवर येऊन ठेपल्याने नवे कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लिम आबालवृद्धांची लगबग सुरु असताना २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री पावणेदहाच्या सुमारास गजबजलेल्या भिक्कू चौकातील एका दुकानाबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीत पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला.

या घटनेत सात जणांचा मृत्यू आणि ९२ जण जखमी झाले होते. मोठय़ा प्रमाणावर चेंगराचेंगरीही झाली होती. याआधी दोन वर्षांपूर्वी २००६ मध्ये शहरातील बडा कब्रस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात ३१ जण मृत्युमुखी आणि तीनशेहून जास्त रहिवासी जखमी झाले होते.

संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात दुसऱ्यांदा बॉम्बस्फोट होतो, एकंदर ३८ बळी तात्काळ जातात तरीही तपास संथ कसा, यावरून उलट सुलट चर्चा सुरु झालीय.

या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले होते. घटनास्थळी तातडीने गेलेले मालेगावचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्यावरही जमावाने हल्ला केला होता. त्या वेळी अंगरक्षक आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून हवेत गोळीबार केल्याने प्रभू हे बालंबाल बचावले होते.

बॉम्बस्फोटप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या गृह मंत्रालयाने दुसऱ्याच दिवशी हा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. २६ / ११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे हे अधिकारी या पथकाचे प्रमुख होते.

शहिद हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात संशयित म्हणून साध्वी प्रज्ञा सिंह यांचे नाव आले होते. या पथकाने प्रारंभी प्रज्ञा सिंहसह काही संशयितांना अटक केली. नंतर या गुन्ह्यात काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात समजले. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली.

प्रज्ञा, पुरोहित आणि उपाध्याय हे या कटाचे सूत्रधार असल्याचं आणि स्फोटात वापरलेली दुचाकी ही प्रज्ञा यांचीच असल्याचा दावा एटीएसने केला होता. यानंतर राजकीय पटलावर ‘भगवा दहशतवाद’ अशी मांडणी करणं सुरू झालं.

सन २०११ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. श्रीकांत पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर या सात जणांविरुद्ध एनआयएच्या विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. हे सातही संशयित सध्या जामिनावर आहेत.

या प्रकरणातल्या संशयित साध्वी प्रज्ञा सिंह यांनी जामिनावर असताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळवली आणि त्या विजयीदेखील झाल्या.

भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या या राजधानीत आले नाहीत, परंतू नजीकच्या छतरपूर येथील निवडणूक प्रचार सभेत २४ एप्रिल २०१९ रोजी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी, साध्वी प्रज्ञा यांना या खटल्यात नाहक गोवण्यात आल्याचा दावा जाहीरपणे केला होता.

खटल्याच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान आजवर २६ साक्षीदारांनी घूमजाव केले आहे. इतकेच नव्हे तर तपास यंत्रणांनी विशिष्ट लोकांची नावे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोपही काहींनी केल्याचे उघड झाले.

या खटल्याच्या कामकाजास विलंब होत असल्याची तक्रार करत त्याविरुद्ध या खटल्यातील एक संशयित समीर कुलकर्णी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सूचना देऊनही हे काम संथपणे सुरू असल्याचा कुलकर्णी याचा आक्षेप आहे.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न एनआयएला विचारला. त्यावर प्रत्येक सुनावणीच्या वेळी किमान दोन साक्षीदारांना हजर ठेवण्यात येत असते; परंतु अनेकदा एकाच साक्षीदाराची साक्ष नोंदविण्याचे काम अनेक दिवस सुरू असते, असे एनआयएतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

एका साक्षीदाराची तर तब्बल नऊ दिवस साक्ष तपासणी झाली. ही तपासणी न्यायालय किंवा आम्ही थांबवू शकत नाही. त्यामुळे खटल्यास विलंब होत असल्याचा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात केला. आरोपींकडून केले जाणारे वेगवेगळे अर्ज हेदेखील खटल्याच्या कामकाजास विलंब होण्याचे एक कारण ठरते.

या खटल्यात आतापर्यंत आरोपींनी ७ हजार १९० अर्ज केल्याची माहिती एनआयएच्या वकिलांनी दिलीय.

मुंबईवरील २६ / ११ चा दहशतवादी हल्ला, अजमेर स्फोट, समझोता एक्स्प्रेस स्फोट यासारखे खटले यापूर्वीच निकाली निघाले असले तरी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीचे काम अद्याप सुरूच आहे. खटल्यात आतापर्यंत २७१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. एकूण ४९५ साक्षीदारांना तपासण्यात येणार असल्याचे याआधी एनआयएने स्पष्ट केले होते. त्यावरून सुनावणीचे अद्याप बरेच काम शिल्लक असल्याचे दिसत आहे.

या खटल्याची एकूणच व्याप्ती बघता निकालासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतरही ‘यांचा सहभाग होता / नव्हता’ अशा प्रकारचा निकाल येणार की स्फोट कोणी आणि का घडवला हेही उघड होणार, हे निश्चित नाहीच.

कर्नल पुरोहितने २००७ मध्ये अभिनव भारत नावाची संघटना सुरू केली होती. त्या संघटनेला भारतीय संविधान मान्य नव्हतं आणि त्यांचा उद्देश भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा होता, असा आरोप आहे.

मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात २००८ मध्ये मोटारसायकलचा वापर करून बॉम्बस्फोट घडवला गेला. ही गाडी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या नावावर होती. या बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता तर १०१ लोक जखमी झाले होते.

आरोपी कर्नल पुरोहितने त्याच्यावर खटला चालवण्यासाठी भारतीय सैन्याची परवानगी आवश्यक असल्याचा दावा केला. मात्र, एनआयएने पुरोहितचा हा दावा फेटाळला. अशी परवानगी केवळ कर्तव्यावर असताना झालेल्या गोष्टींबाबत लागते. मालेगाव बॉम्बस्फोट घडवणं हा पुरोहितच्या कर्तव्याचा भाग नव्हता, असं एनआयएने म्हटलंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :