मुंबईतल्या वाहतुकीच्या समस्यांवर नव्या वर्षात मिळणार सोल्युशन !
मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण, वाया जाणारे मौल्यवान इंधन आणि मानवी तास अशा सर्व अडचणींवर नवीन वर्षात सोल्युशन Solution मिळणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार आदी महानगरांतील विविध पायाभूत प्रकल्पांची रुजवात झाली आहे. त्यापैकी काही प्रकल्प मार्गी लागत असल्याने त्याचा फायदा मुंबई महानगर प्रदेशातील लाखो नागरिकांना होणार आहे.
मेट्रोने मुंबईकरांना आधार दिला असून, मेट्रोचे अन्य मार्गही लवकरच खुले होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पश्चिम-मध्य-हार्बर-ट्रान्सहार्बर सेवांसाठी विविध योजना मार्गी लागत आहेत. एमएमआरडीए, मध्य रेल्वे, ठाणे महापालिका, मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मुंबई महापालिका, सिडको, एमएसआरडीसी आदी विविध संस्थांमार्फत ठिकठिकाणी विकासप्रकल्प राबविले जात आहेत.
मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतील मेट्रो, विमानतळ, मुंबई-ठाणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडीपासून सुटका अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांनी नव्या वर्षापासून सुरक्षित, कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव येण्यास सुरुवात होणार आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, लिंक रोडवरील वाहतूक कोंडी आणि लोकल सेवांवरील प्रचंड ताणावर मेट्रो सेवेचा पर्याय उपयुक्त ठरला आहे. मुंबईतील वर्सोवा ते घाटकोपर या पहिल्यावहिल्या मेट्रो सेवेस प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो ७ सेवा देखील काही अंशाने सेवेत रुजू झाली आहे. नव्या वर्षात जानेवारीत ही संपूर्ण मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वेवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
राज्यातला पहिला भूमिगत मार्ग मेट्रो ३च्या रूपाने उभा होत आहे.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ चा बीकेसी ते आरे हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेरीस उपलब्ध होईल. त्यावरील सर्व २७ स्थानकांची उभारणी सुरू आहे.
मुंबईला पश्चिमेकडून उत्तर-दक्षिण जोडणारी ही महत्त्वाची बीकेसी दक्षिण ते कफ परेड ही मार्गिका २०२४मध्ये सेवेत येईल.
एमएमआरडीएने मेट्रो ४ मधील वडाळा ते कासारवडवली अडथळे दूर केले आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणेवासियांनाही या वर्षात एक खुशखबर मिळणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर जानेवारीअखेरपर्यंत नवे दिघा स्थानक प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक फायदा ठाणे, ऐरोली परिसरातील प्रवाशांना होईल.
मध्य रेल्वेच्या प्रकल्पातील बेलापूर/नेरुळ ते उरण मार्गाचा अंतिम टप्पा मार्चअखेरीस खुला होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बेलापूर ते उरणपर्यंत स्वतंत्र मार्गिकेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.