मिराई कार बनणार भारताचं भविष्य ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कारमधूनच संसदेत जाणार !
वाढतं प्रदूषण, जागतिक तापमानवाढ तसंच इंधनाचे वाढते भाव म्हणून इलेक्ट्रीक कार्सचा पर्याय समोर येत असताना ग्रीन हायड्रोजन या इंधनावर चालणारी भारतातली पहिली कार आता समोर आली आहे.
प्रसिद्ध कार कंपनी टोयाटोने मिराई (Toyota Mirai) ही कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते लॉन्च केली. विशेष म्हणजे गडकरींनी स्वत:ही या कारमधून प्रवास केलाय. ते संसदेत जाण्यासाठी देखील या कारचा वापर करणार आहेत. ही कार टोयोटा कंपनी आणि किर्लोस्कर (Toyota Kirloskar) यांनी मिळून तयार केली आहे.
ग्रीन हायड्रोजनच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ही कार आधारित असून या कारचं नावही विशेष आहे. कारण जपानी भाषेत मिराईचा अर्थ भविष्य असा असल्याने ही कार वाहनांचं भविष्यचं म्हणावी लागेल. या कारचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सामील करण्यात आलं असून 1300 किलोमीटरचा प्रवास या कारमधून करण्यात आला आहे.
पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन, एफसीईव्ही तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता पसरवणे आणि भारतात हायड्रोजन-आधारित कार्सचा प्रसार करणे या कारच्या लॉन्चमागील मुख्य उद्देश आहे. तीन हायड्रोजन सिलेंडर कारमध्ये असून हायड्रोजन कार म्हणून ही भारतातील पहिलीच कार असल्याने यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
या कारमध्ये 1.4 किलोवॅटची बॅटरी आहे. कारच्या मायलेजचा विचार करता एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरण्याची क्षमता असून एका सिलिंडरवर ही कार 650 किमी प्रवास करु शकते. ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे केले जाते.