ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढताहेत महिला भगिनी ! अहमदनगर जिल्ह्यातल्या ‘या’ तालुक्यातली अनोखी परंपरा !
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळंवेगळं महत्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे.
हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी या ठिकाणी गर्दी करतात.
ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला (Hanuman Jayanti) महिलांना दिला जातो. ब्रिटीशांच्या काळापासून ही परंपरा सुरु आहे. ब्रिटीशांनी घातलेली बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथ यात्रा काढली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे.
या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो. महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास असून ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं. हनुमान जयंतीच्या पहाटे म्हणजेच 23 एप्रिल 1929 रोजी मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला.
पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक 200 ते 250 महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले. भिती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली.
सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला पण भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला. या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन ‘बलभीम हनुमान की जय’चा जयघोष केला. कुणालाही काही कळण्याच्या आत रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली.
श्रीराम विजयरथाच्या मिरवणुकीची परंपरा 1929 पासून आजतागायत कायम आहे. पोलिसांचा ध्वज मिरवणुकीत आणून रथाची पूजा पोलीस अधिका-यांच्या हस्ते करण्यात येते. रथयात्रेला अनेक वर्षांची परंपरा असून युवतींचा सहभागही मोठ्या प्रमाणात असतो. तर खास हा मान मिळविण्यासाठी उत्सव पाहण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील महिला आवर्जून हजेरी लावतात.
1929 ला महिलांनी चौकातून रथ ओढत संत वाड्याच्या पुढे नेल्यानंतर तो पोलिसांनी बैलगाड्या आडव्या लावून अडवला. तेव्हा दोन महिने हा रथ रंगार गल्लीतच उभा ठेवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली. झुंबराबाईंचा प्रातिनिधिक सत्कार करुन दरवर्षी ही परंपरा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले. महिला सन्मानाची प्रथा नंतरच्या काळात थांबली पण ध्वज नेण्याची परंपरा आजही अखंडित आहे.
महाराष्ट्रात अनेक मारूती मंदिरातही महिलांना जाण्यास मनाई असताना संगमनेरात मात्र हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघणारा रथ महिला ओढण्याची परंपरा कायम आहे.