नायगाव रेल्वेस्थानकाजवळील वाहनतळाला आग ; १५ ते १६ दुचाकी वाहनं जळून खाक !
नायगाव रेल्वे स्थानकाच्या जवळील वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागली. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत सुमारे १५ ते १६ दुचाकी वाहनं जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
नायगाव पश्चिमेच्या भागात रेल्वे स्थानकाला लागून आणि नायगाव उड्डाणपुलाच्या खाली वाहनतळ आहे. या ठिकाणी अनेक वाहनं पार्किंगमध्ये उभी होती. दरम्यान सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनाने पेट घेतला.
वाहनतळात ही वाहने जवळजवळ उभी असल्याने आग वाढत गेली आणि त्यात १५ ते १६ दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना आणि पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. याआगीत वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या वाहनतळामध्ये शेकडो वाहनं उभी होती. मात्र नायगाव पश्चिमेच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने ती बाजूला केली. त्यामुळे मोठी हानी टळली. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनास्थळी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जळून खाक झालेल्या वाहनांचा पंचनामा केला आहे.