अहमदनगरच्या ‘या’ फळाचा ज्युस गेलाय थेट अमेरिका, इंग्लंड, दुबईत !
शेतकर्यांना मिळतोय अप्रत्यक्षपणे फायदा !
नगर तालुक्यात सर्वत्र पेरूच्या बागा कमी अधिक प्रमाणात आढळतात. मात्र जेऊर पट्टा हा पेरू उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. या पट्ट्यात पेरूचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. येथील जमीन हवामान पेरू बागांसाठी पोषक आहे. या पेरूपासून बनवलेला ज्यूस अमेरिका, इंग्लंड, दुबई या ठिकाणी निर्यात होत असल्याने यातून तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांना कुठे ना कुठे अप्रत्यक्षपणे फायदा मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी कायमच वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत राहत असतात. जिल्ह्यात फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यामध्ये डाळिंब, पेरू यांसारख्या फळ पिकांचा समावेश होतो. जिल्ह्यातील नगर तालुक्यात पेरू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
विशेष म्हणजे नगर तालुक्यातलं हवामान या पिकांसाठी विशेष अनुकूल असल्याने पेरूचे विक्रमी उत्पादन शेतकरी बांधव घेत आहेत. तसेच येथील शेतकऱ्यांच्या पेरूची गुणवत्ता चांगली असल्याने याला राजधानी मुंबईसारख्या मेट्रो शहरात आणि गोवा, गुजरात सारख्या परराज्यांत मोठी मागणी आहे.
या पिकासाठी मुरमाड तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन अधिक फायदेशीर असते आणि अशीच जमीन या भागात आढळत असल्याने येथील शेतकऱ्यांना पेरूच्या पिकातून चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळत आहे. यामुळे येथील पेरू राज्यभर तसेच परराज्यात देखील मोठ्या प्रमाणात पाठवला जात आहे.
या पिकाचा हंगाम ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान असतो. म्हणजे यावेळी फळांची तोडणी केली जाते. काही जाती अशा आहेत ज्या संपूर्ण हंगामभरं फळधारणा करण्यास सक्षम आहेत. मात्र या पिकाची उत्पादकांना अधिक काळजी घ्यावी लागते. पेरू पिकाला आद्रता, दव, ढगाळ वातावरण यांसारख्या हवामान बदलाचा फटका बसतो.
या अशा हवामानामुळे बुरशी, देवी, लालमासी यांसारख्या कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे पेरू उत्पादकांना आर्थिक फटका बसतो. साहजिकच रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची फवारणी करावी लागते तसेच रासायनिक खतांची अधिक मात्रा द्यावी लागते.